मंगरूळ येथे बालविवाह पोलीस पाटील व ग्रामविकास अधिकारी यांनी रोखला

कळंब /जयनारायण दरक—–
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार विवाहयोग्य वय मुलगी 18 वर्ष व मुलगा 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह करता येत नाही तसा विवाह केल्यास बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कलम 10 व कलम 11 नुसार दोन वर्ष सश्रम कारावास व एक लाख रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे परंतु या कायद्याविषयी मुला /मुलींच्या पालकांना माहिती नसल्याने व त्यांचे योग्य समुपदेशन होत नसल्याने असे बालविवाह आयोजित केले जातात परंतु संबंधित अधिकाऱ्याची सतर्कता असेल तर बालविवाह रोखता येतात असाच एक बालविवाह कळंब तालुक्यातील मंगरूळ येथील दशरथ अश्रुबा बनसोडे राहणार मंगरूळ (बारड वस्ती ) तालुका कळंब यांची मुलगी सुप्रिया दशरथ बनसोडे इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या वय वर्ष 16 वर्ष हिचा विवाह हनुमंत जनार्दन वाघमारे उंबरज पारगाव यांच्या मुलाशी दिनांक 30 मार्च रोजी आयोजित केला होता या विवाहाची तयारी ही पूर्ण झाली होती मुलगी अल्पवयीन आहे व तिचे पालक हा विवाह करीत आहेत याविषयीची माहिती पोलीस पाटील धोंडीराम झांबरे यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ मंगरूळ येथील बरड येथे मुलीचे पिता दशरथ अश्रुबा वाघमारे व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेऊन मुलगी अल्पवयीन असल्याने आपणास सदरील विवाह करता येणार नाही असे सांगून कायद्याविषयी त्यांना माहिती दिली व यानुसार मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी कायद्याने विवाहयोग्य होईपर्यंत विवाह करणार नाही असे हमीपत्र दिनांक 29 मार्च रोजी पोलीस पाटील धोंडीराम झांबरे , ग्रामविकास अधिकारी सोनवणे बी.बी. यांच्याकडे लिहून दिले आहे योग्य वेळी सतर्कता दाखल्यामुळे हा बाल विवाह थांबविण्यात यश आले आहे याप्रसंगी मंगरूळ येथील अमोल शिंदे, अशोक माने, शिराढोण पोलीस स्टेशन मंगरूळ बीट अंमलदार बालाजी गोंडकर व अन्य ग्रामस्थांची उपस्थिती होती .