पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत आगाऊ पैसे घेतल्यास या नंबरवर थेट तक्रार करा

राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना राज्यभर लागू केली आहे.
पूर्वी शेतकऱ्यांचे हेक्टरी बाराशे रुपये विमा भरण्यासाठी खर्च होत होते. आता फक्त एक रुपयात विमा भरता येत असल्यामुळे पिकाचा विमा उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या चार ते पाच पटीने वाढली आहे. पीक विम्याचा अर्ज मोफत भरून देण्याचे आदेश असतानाही पिक विमा उतवणाऱ्या शेतकऱ्याची गर्दी लक्षात घेऊन ऑनलाइन सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्याकडून शंभर ते दीडशे रुपयांची आर्थिक लूट सुरू केली.
ही बाब शासनाच्या लक्षात
आल्याने यावर्षी अशी आर्थिक लूट करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.एक रुपये पिक विमा उतरवण्यासाठी मागील वर्षापासून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सेतू केंद्र तसेच ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये शेतकरी गर्दी करत आहेत. विम्याचा अर्ज भरण्यासाठी सीएससी केंद्र चालकांना शासनाकडून प्रतिअर्ज ४० रुपये अनुदान दिले जाते. तरीसुद्धा केंद्र चालक शेतकऱ्याकडून सातबारा काढण्याच्या नावाखाली तसेच प्रिंट कॉपी देण्यासाठी शंभर ते दीडशे रुपयांची मागणी करून त्यांची आर्थिक लूट करतात.
पैसे घेतल्यास थेट तक्रार करा
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी
१ रुपयात पिक विमा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी सीएससी केंद्र चालक अवैधरित्या आगाऊ रक्कम शेतकऱ्याकडून वसूल करत असल्यास कृषी हेल्पलाइन
९८२२४४६६५५ या व्हाट्सअप क्रमांकावर तक्रार नोंदवावी किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन कृषी मंत्रालयाच्या वतीने देखील करण्यात आलेले आहे.