वाशी तहसील कार्यालयावर जाणीव संघटनेच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन

कळंब (प्रतिनिधी) वाशी तहसिल कार्यालयावर
जाणीव संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त वृद्ध,निराधार, शेतकरी, शेतमजूर,गायरान धारक, एकल महिला, दुष्काळ या प्रश्नावर जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांच्या नेतृत्वाखाली वाशी तहसील कार्यालयावर दि. 24 जानेवारी 2024 रोजी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधी दि. 16 जानेवारी 2024 रोजी वाशी तहसीलचे पेशकर श्री. जनार्दन तवले यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनामध्ये महाराष्ट्र शासनाने वाशी तालुका दुष्काळी जाहीर करून कुठलीही अंमलबजावणी केली नाही, जनावराला दावणीला चारा, पिण्याचे पाणी दुष्काळी उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, वाशी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना पेन्शन वाटपात 2022 पासून तफावत असून सातत्याने सर्वांनी श्रावणबाळ सेवा योजना अर्ज भरून देखील कोणाला तेराशे ते कुणाला पंधराशे दरमहा वाटप करून लाभधारकांमध्ये भेदभाव केला जातो व काहींना केंद्राचा वाटा येऊन देखील पेन्शन दिली जात नाही, चालू पेन्शन बंद केली जाते या सावळ्या गोंधळाची सकल चौकशी होऊन सर्वांना समान पेन्शन वाटप करण्यात यावी, वाशी तालुक्यात 1985 पासून 18 गावातून दलित आदिवासी पारधी यांनी शासकीय पडीत गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पिके काढून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत या संबंधित अतिक्रमित शेतकऱ्यांच्या नावे सात बारा द्यावा यासाठी सातत्याने निवेदने, धरणे आंदोलने करून देखील कसलेही कार्यवाही होत नाही. तरी वस्तुस्थितीची पाहणी करून गायरान जमिनी तात्काळ नावावर कराव्यात, एकल महिला, विधवा, परितक्त्या, आर्थिक दुर्बल, गोरगरीब यांना पेन्शन मंजुरीसाठी 21 हजाराचे वार्षिक उत्पन्न अट रद्द करून 51 हजार रुपये वार्षिक अट लागू करावी, व सर्व गरिबांना पेन्शनचा लाभ देण्यात यावा, वाशी तालुक्यातील मागासवर्गीय दलित पारधी यांना गावोगावी स्मशानभूमी देण्यात यावी,तसेच ज्या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध आहे त्या स्मशानभूमी नावावर करून ताब्यात देण्यात याव्यात, विभक्त कुटुंबांना शिधापत्रिकेची फोड करून नवीन शिधापत्रिका वाटप करण्यात यावी, वाशी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्यात अशा मागणीसाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संबंधी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे, उत्तम गरड, सुभाष गाडे यांनी निवेदन दिले आहे.तरी वाशी तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन जाणिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी केले आहे.