धाराशिव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन

तेरणा काठ वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याणकारी धोरणांतर्गत दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ जलद गतीने मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे नूतन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचा थाटात उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण कार्यालय स्थापन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता.अप्पर मुख्य सचिव अनिल डीगीकर तसेच उपसचिव सुनंदा घड्याळे अवरसचिव अधिकराव बुधे यांनी शंभर दिवस कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पहिल्या टप्प्यात राज्यात 13 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण सक्षमीकरण कार्यालय एक मे पासून सुरू करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर धाराशिव येथे नव्याने सुरू करण्यात आले
या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.तसेच नूतन दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सच्चिदानंद बांगर यांच्याकडे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाची सूत्रे अधिकृतपणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याप्रसंगी सुपुर्द केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरावत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध दिव्यांग संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.