2022 चा जिल्ह्यातील (धाराशिव)शेतकऱ्यांना खरीप पिक विमा तत्काळ देण्याची मागणी-कोकणे

कळंब जयनारायण दरक
खरिप पिक विमा 2022 मधील मोहा, सावरगाव, सलगरा, पाडोळी( अक्काबाई), आनाळा व सोनारी या महसूल मंडळांची खरिप विमा रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्याची मागणी कळंब तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील खरीप पिक विमा 2022 मधील राहिलेली रक्कम मिळणे कामी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा मंडळ, तुळजापूर तालुक्यातील सावरगाव व सलगर मंडळ, धाराशिव तालुक्यातील पाडोळी( आक्काबाई ) व परंडा तालुक्यातील आनाळा व सोनारी ही महसूल मंडळे खरीप पिक विमा मिळण्यापासून वंचित आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील वरील सहा (६) महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप विमा रक्कम मिळण्यासाठी विलंब होणे हे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. सदरील विषय विभागीय कृषी आयुक्तालयाकडून वित्त विभागाकडे यासंदर्भातील अहवाल गेल्याचे समजते, तरी मा. मुख्यमंत्री यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राहिलेली खरीप विमा 2022 ची हक्काची रक्कम जलद गतीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विश्वास हनुमंतराव कोकणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे