ताज्या घडामोडी

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत कामे पूर्ण करावीत –जिल्हाधिकारी

श्री.येडेश्वरी देवी यात्रा नियोजनाचा आढावा*

तेरणा काठ वृत्तसेवा — येरमाळा येथे १२ ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान श्री येडेश्वरी देवी मंदिर परिसरात चैत्र पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक येणार आहे.मोठ्या संख्येने भाविक या यात्रेला येणार असल्यामुळे यंत्रणांनी यात्रेच्या काळात आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करून यात्रेदरम्यान भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

आज येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी यात्रा नियोजनाचा विविध यंत्रणांकडून मंदिरातील सभागृहात आढावा घेताना श्री.पुजार बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अशफत आमना, कळंब उपविभागीय अधिकारी संजय पाटील,कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार व तहसीलदार हेमंत ढोकले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी.पुजार म्हणाले,यात्रेदरम्यान काम करणाऱ्या यंत्रणांनी आपआपली जबाबदारी वेळीच पार पाडावी.वीज वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने काम करावे. यात्रेदरम्यान योग्य समन्वयासाठी देवस्थान परिसरात यंत्रणांची एक कंट्रोल रूम सज्ज ठेवावी.या कंट्रोल रूममध्ये मंदिर ट्रस्ट व विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असावा.त्यामुळे यात्रेदरम्यान येणाऱ्या अडीअडचणी व समस्या वेळीच सोडवता येतील.यात्रेदरम्यान नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश संबंधित विभागाने काढावे.भाविकांशी यात्रेदरम्यान सौजन्याने वागावे.यात्रा उन्हाळ्याच्या दिवसात असल्यामुळे उष्माघाताची शक्यता लक्षात घेता,आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात.यात्रेदरम्यान भाविकांच्या वस्तू,मोबाईल व लहान मुले हरवितात,अशावेळी लाऊड स्पीकरवरून उद्घोषणा करण्याचे नियोजन करण्यात यावे,असे श्री.पूजार यांनी यावेळी सांगितले.

यात्रेदरम्यान वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही,याची दक्षता घेण्यात यावी असे सांगून श्री पुजार म्हणाले,येरमाळा गावापासून ते मंदिरापर्यंत ज्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत,ती तातडीने पूर्ण करावी,त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे.यात्रेदरम्यान वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी.दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात यावी.आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे,असे ते म्हणाले.

डॉ घोष म्हणाले,यात्रेदरम्यान परिसरात स्वच्छता ठेवावी. जागोजागी कचराकुंड्या ठेवाव्यात.त्यामुळे कचरा इतरत्र पसरणार नाही.पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या चाचण्या कराव्यात.भाविकांना शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.आरोग्य विभागाने यात्रेच्या काळात आरोग्य शिबिराचे आयोजन करून भाविकांना आरोग्यविषयक सेवांचा लाभ मिळून द्यावा.पथदिवे रात्रीला पूर्णता सुरू राहतील,याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे.असे डॉ.घोष म्हणाले.

पोलीस अधीक्षक श्री.जाधव यांनी यात्रेदरम्यान भाविकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देत असताना त्यांच्या सुरेक्षेची काळजी पोलीस विभाग घेईल. आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल.पार्किंगची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात यावी.यात्रेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. भाविकांच्या दर्शन रांगांसाठी व्यवस्थित बॅरिकेट्स तयार करण्यात यावे.यात्रेकडे येणाऱ्या मार्गावर शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.सर्वांच्या समन्वयातून यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यात येईल असे श्री.जाधव यावेळी म्हणाले.

यावेळी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री.देशमुख यांनी सांगितले की,यात्रेदरम्यान चार ठिकाणी बस शेड तयार करण्यात येतील. मागील वर्षी १८० बसेसचा वापर यात्रेदरम्यान भाविकांसाठी करण्यात आला. या वर्षी देखील तसेच नियोजन करण्यात आले आहे.डॉ.मिटकरी यांनी यात्रेदरम्यान भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात येईल.प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कामे करण्यात येतील.पिण्याच्या पाण्याची चाचणी करण्यात येईल.वैद्यकीय पथके यात्रेदरम्यान तैनात राहणार आहे. उष्माघाताची शक्यता लक्षात घेता,मंदिर परिसरात कोल्ड रूम तयार करण्यात येईल. यात्रेच्या परिसरात १०८ च्या १० रुग्णवाहिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यात्रेदरम्यान आवश्यक तेवढा वीज पुरवठा करण्यात येईल. या दरम्यान वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.यात्रेत विविध स्टॉल लावणाऱ्या दुकानांना देखील वीज कनेक्शन देण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.

कळंब पंचायत समितीच्या वतीने ४ ते २१ एप्रिल दरम्यान यात्रेकरिता कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येतील.भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल.विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल.रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून कामे सुरू असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने यावेळी दिली.

मंदिर ट्रस्टच्या वतीने यात्रेच्या तयारीची माहिती ट्रस्टचे संतोष आगलावे यांनी दिली.उपसरपंच .गणेश बारकुल यांनी यात्रेसाठी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली.यावेळी उपस्थित काही ग्रामस्थांनी सुद्धा यात्रेच्या आयोजनाविषयी त्यांचे मनोगत व्यक्त केले. संचालन मंदिर ट्रस्टचे समाधान बेदरे यांनी केले.प्रास्ताविक तहसीलदार हेमंत.ढोकले यांनी तर उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी मानले. यावेळी यात्रेच्या आयोजनाशी संबंधित यंत्रणांचे जिल्हास्तरीय अधिकारी व कळंब तालुका यंत्रणांचे अधिकारी, गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर,,सरपंच सौ.प्रिया बारकुल,माजी सरपंच विकास बारकुल,उपसरपंच गणेश बारकुल,देवीचे मानकरी अमोल पाटील,यशवंत पाटील,देवस्थानचे उपाध्यक्ष संजय आगलावे,ग्रामस्थ,पुजारी, यांच्यासह यात्रा संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.