कळंब तालुक्यात चक्काजाम; सकल मराठा समाज आक्रमक

कळंब/ जयनारायण दरक
,शासन सगे सोयरे संदर्भात अध्यादेश काढण्यात विलंब करत आहे. शिवाय गेल्या सहा दिवसापासून मराठा योध्दा जरागे पाटील यांची प्रकृती दिवसें दिवस खालावत आहे. त्यामुळे सकल मराठा समाजात संतप्त भावना निर्माण होत आहे. शुक्रवार 16 फेब्रुवारी कळंब तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी बेमुदत बंद तर काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात विविध मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील दहा फेब्रुवारीपासून आहेत. शासनाने संगे सोयऱ्यांचा अध्यादेश काढावा यासाठी उपोषण सुरू आहे. सात दिवसानंतर हि शासनाने दखल घेतली नाही. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. समाजामध्ये राज्य सरकार विरोधात असंतोष निर्माण झाला आहे.
गुरुवारी लातूर कळब मार्गावर लातूर आगाराच्या बसवर दगडफेक केल्याने शुक्रवार (ता. १६) विविध मार्गावरील बस फेऱ्या बंद करण्यात आल्याने आगारात शुकशुकाट निर्माण झाला होता. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहावयास मिळाले. तालुक्यातील येरमाळा ,देवळाली येथील शेकडो समाज बांधवांनी हायवे मार्गावर रस्ता रोको करून शासनाचा निषेध केला. तालुक्यातील हावरगाव येथे रस्त्यावर झाडी तोडून टाकण्यात आली. यामुळे चार तास या हासेगाव-ईटकुर पारा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
लातूर-कळब -भाटसावंगी मार्गावर – खोदला, परिसरातील मराठा समाज एकत्र येत खोदला पाटीवर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील मोहा येथे शेकडो समाज बांधवांनी घोषणा देत चक्काजाम आंदोलन केले. यामुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच भंबेरी री उडाली होती.
कळंब पासून जवळ असलेल्या खडकी गावात लातूर कळंब मार्गावर एसटी बस फोडण्याचा प्रकार घडल्यामुळे सकाळपासून कळंब आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे महामंडळाला लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. जवळपास सर्वच आगारातून बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. कळंब येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच फोटोना काळे फासून संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन पेटू लागली आहेत.