ताज्या घडामोडी

तुम्हीचं सांगा जिंकणार कोण? धाराशिवकराची वाढली धाकधूक

उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले. या निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे. 19 लक्ष 92 हजार 737 मतदारांपैकी 12 लक्ष 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लक्ष 90 हजार 533 पुरुष, 5 लक्ष 82 हजार 416 स्त्री आणि 20 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदान टफ झाल्याने आता नेमके जिंकणार कोण ? निकालाची धाकधूक वाढली आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. उस्मानाबाद – कळंब वगळता अन्य पाचही विधानसभा मतदारसंघाचे आमदार महायुतीचे आहेत. तसेच विक्रम काळे आणि सतीश चव्हाण हे विधान परिषदेचे आमदार देखील महायुतीचे आहेत. त्यात काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकाकी लढत दिली. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरुवातीला खा. ओमराजे निंबाळकर पुन्हा निवडून येतील असा अंदाज सर्वच वृत्तवाहिनीनीने व्यक्त केला होता. परंतु भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच, निवडणूक एकतर्फी न होता, अटीतटीची झाली.
शेवटच्या दिवसात महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी आघाडी घेतल्याने काट्याची टक्कर झाली आहे. त्यामुळे कोण विजयी होणार ? हे कुणीही सांगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
येत्या 4 जून 2024 रोजी 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतमोजणी होणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून सर्वांचे लक्ष 4 जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.