समाजभूषण पुरस्कर्त्यांनी हूरळून न जाता,अधिक जोमाने कामास लागावे – के.व्ही.सरवदे

जयनारायण दरक/कळंब
कळंब – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाकडून मिळालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कर्त्यानी हुरळून न जाता अधिक जोमाने कामाला लागावे असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे यांनी सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणातून केले.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली निराधार बालकाश्रम तांदुळवाडी रोड,कळंब येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त ठाणे जिल्ह्यातील तात्यासाहेब सोनवणे,धाराशिव जिल्ह्यातील विजय गायकवाड तसेच ज्येष्ठ विधिज्ञ अँड.त्र्यंबक मनगिरे, एहसास फाउंडेशनचे अध्यक्ष अमन मोमीन,एन.डी.जे.एम.चे राज्य निरीक्षक दिलीप आदमाने यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि लोहटा (पु), करंजकल्ला,हावरगाव, तांदुळवाडी येथील भजनी मंडळातील कलावंतांचा सन्मान सोहळा दिनांक ५ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता प्रबुद्ध रंगभूमी बहूउउद्देशीय संस्थेने भारत जोडो अभियानाच्या विशेष उपक्रमार्तंगत ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता.
या सन्मान सोहळ्याचे उद्घाटन डॉ.संजीवनी जाधवर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक रमेश बोर्डेकर,ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ. प महादेव महाराज अडसूळ,साने गुरुजी कथामालाचे अध्यक्ष डी.के कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
के.व्ही.सरवदे पुढे बोलतानी म्हणाले की, कित्येक दशकांच्या सामाजिक कार्याची दखल जेंव्हा शासन स्तरावरून घेतली जाते तेव्हा त्या कार्यकर्त्यांचे सामाजिक आणि सर्वोच्च क्षेत्रात दिलेल्या योगदानाची तपश्चर्या फळास येत असल्याचे उदाहरणासह सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत राजपूत यांनी प्रबुध्द रंगभूमीचे विविध क्षेत्रातील कलावंतासाठी असलेले कार्य प्रस्तावनेतून विशद करून लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी भारत जोडो अभियानाचा हा विशेष उपक्रम असल्याचे सांगितले.
या प्रसंगी महाराष्ट्र पोलीस मित्र असोसिएशनचे संत सुफी समशोद्दीन सय्यद, ह.भ.प महादेव महाराज अडसूळ,रमेश बोर्डेकर, डी.के.कुलकर्णी,विलास करंजकर,प्रबुद्ध रंगनभूमीचे अध्यक्ष सुभाष द.घोडके, सत्कारमूर्ती अँड.त्र्यंबक मनगिरे, समाजभूषण पुरस्कार प्राप्त तात्यासाहेब सोनवणे,विजय गायकवाड आदींनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंचालन प्रा.अविनाश घोडके यांनी केले.तर ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू आबा ताटे यांनी सर्व मान्यवरांचे रसभरीत असे ठुमक्यात आभार मानले.
– या सोहळ्याच्या उद्घाटनपर भाषणातून डॉ.संजीवनी जाधवर यांनी साहित्य,सांस्कृतिक,सांप्रदायिक, विधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्याचा आलेला योग मला सुध्दा वेगळीच प्रेरणा देऊन गेला असून प्रबुद्ध रंगभूमीने ग्रामीण साहित्य वाचकासाठी उपलब्ध करून दिल्यास नवोदितांना संजीवनी मिळेल.-
डॉ.संजीवनी जाधवर