तेरणा साखर कारखान्याचा पहिला हप्ता २,८२५ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

जयनारायण दरक/कळंब
कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांची लक्ष्मी म्हणून ओळखला जाणा-या तेरणा साखर कारखान्यास गाळपासाठी दिलेल्या ऊसाचा पहिला हप्ता २,८२५ रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. अशी माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जयवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी बॅंकेतून ऊस बिलाचे पैसे उचलून घ्यावेत, असे आवाहन चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या बारा वर्षांपासून बंद पडलेला तेरणा सहकारी साखर कारखाना सुरू होतो की नाही ? असा प्रश्न तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या तोंडातून सहजपणे बाहेर पडायचा ! मात्र धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी दोन वर्षांचा प्रदीर्घ न्यायालयीन लढा देऊन, तेरणा साखर कारखाना भैरवनाथ शुगर्स साखर कारखान्याकडे २५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला. अन् शेतकऱ्यांसह संपूर्ण धाराशिव जिल्हावाशियासाठी अशक्य वाटणारी गोष्ट सावंत कुटुंबातील सदस्यांनी शक्य करून दाखवली. भैरवनाथ शुगर्सचे सर्वेसर्वा आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत, चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत, कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह संपूर्ण अधिकार वर्ग, कर्मचारी, हितचिंतकांनी तब्बल आठ महीने अथक परिश्रम घेऊन बारा वर्षांपासून बंद पडलेली शेतकऱ्यांची लक्ष्मी पुन्हा सुरू केली. त्यामुळे तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह तज्ञ व जानकरातून व्यक्त केल्या जात आहेत. तरी तेरणा साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती करण्यासाठी जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन तेरणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांनी केले आहे.