भारत स्काऊट आणि गाईड चा जिल्हा मेळावा येरमाळा येथील विद्यानिकेतन शाळेत

तेरणा काठ वृत्तसेवा—————-
धाराशिव भारत स्काऊट आणि गाईड चा जिल्हा मेळावा येरमाळा या ठिकाणी विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून कब बुलबुल, स्काऊट गाईड मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या मेळाव्यात जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी कब बुलबुल 300, स्काऊट गाईडचे 700 विद्यार्थी व विद्यानिकेतन चे 1000 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवलेला आहे
या मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये लोकनृत्य, समूह गीत, तंबू सजावट, बिन भांड्याचा स्वयंपाक, संचलन स्पर्धा, शारीरिक प्रात्यक्षिके, हस्तकला, प्रश्नमंजुषा, भव्य शेकोटी स्पर्धा, शोभायात्रा इत्यादी मनोरंजनात्मक स्पर्धा घेतल्या जातात. जागतिक पातळीवर विद्यार्थ्यांना शिस्त लावणारी संस्था म्हणून भारत स्काऊट आणि गाईड ही संस्था कार्य करते. या मेळाव्याचे उद्घाटन दिनांक 06/02/2025 गुरुवार रोजी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी प्राथमिक अशोक पाटील , जिल्हा आयुक्त गाईड तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प धाराशिव श्रीमती सुधा साळुंखे , जिल्हा संघटक स्काऊट विक्रांत देशपांडे, जिल्हा चिटणीस तथा उपशिक्षणाधिकारी माध्यमिक दत्तात्रेय लांडगे , जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती सविता पांढरे, जिल्हा सहचिटणीस श्रीमती उषा सर्जे, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी वर्ग व संस्थापक अध्यक्ष विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलचे सचिन पाटील उपस्थित होते. लॉर्ड बेडन पॉवेल, लेडी बेडन पॉवेल, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रीतसर उद्घाटन करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनैक घोष यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्त व विविध स्पर्धांचे कौतुक केले. व मेळाव्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. डायटचे प्राचार्य जटनुरे साहेब यांनी दरवर्षी अशा मेळाव्यात एक थीम घेऊन समाज उपयोगी कार्य करावे अशी भावना व्यक्त केली. रात्री विद्यार्थ्यांनी लोकनृत्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली.सहभागी विद्यार्थी विद्यानिकेतनच्या परिसरामध्ये तंबू मध्ये रहिवास करतात, उपलब्ध परिस्थितीचा सामना करून तीन दिवस खेळीमेळीने एकत्र राहतात, विविध स्पर्धेत भाग घेतात यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होण्यास मदत होते. तरी अशा दिमागदार जिल्हा मेळाव्याचा लाभ येरमाळा परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन विक्रांत देशपांडे यांनी केले आहे.