ताज्या घडामोडी

बांधकाम विभागातील एकाच ठिकाणी अनेक वर्षे सेवा केलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या तात्काळ जिल्हाबाह्य बदल्या करा!

तेरणा काठ वृत्तसेवा : जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अधीक्षक अभियंता मंडळातील काही अधिकारी व कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. हे अधिकारी शासनाच्या नियमांना बगल देऊन, राजकीय दबावाचा वापर करून, आपल्या पदांवर टिकून आहेत. या संदर्भात रिपाइ (खरात) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन सादर केले असून, अशा अधिकाऱ्यांची तात्काळ जिल्हाबाह्य बदली करण्याची मागणी केली आहे.

*नियमांची पायमल्ली आणि भ्रष्टाचाराला चालना!*
राऊत यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, काही अधिकारी आणि कर्मचारी सेवेत रुजू झाल्यापासून ते सेवानिवृत्तीपर्यंत एकाच ठिकाणी कार्यरत राहतात. बदली धोरणानुसार वर्ग-1 च्या अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी आणि वर्ग-2, 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांची पाच वर्षांनी बदली होणे आवश्यक आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागात हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

यामुळे जिल्ह्याच्या विकासावर विपरीत परिणाम होत असून, भ्रष्टाचारास चालना मिळत आहे. काही अधिकारी अवैध संपत्ती कमावण्यास प्रोत्साहित होत आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

*बदलीसाठी ३० दिवसांची मुदत – अन्यथा आंदोलनाचा इशारा!*
राऊत यांनी प्रशासनाला ३० दिवसांची मुदत देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाली नाही, तर रिपाइ (खरात) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

*बदली टाळण्याचे डावपेच!*
अनेक वेळा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फक्त तालुकास्तरीय बदली केली जाते. मात्र, हे कर्मचारी स्वतःच्या सोयीप्रमाणे डेपुटेशनवर पुन्हा मुख्यालयात रुजू होतात. त्यामुळे बदल्या केवळ कागदावरच राहतात आणि वास्तवात कोणताही फरक पडत नाही.

*तात्काळ चौकशीची मागणी*
राऊत यांनी बांधकाम विभाग व अधीक्षक अभियंता मंडळातील सर्व कर्मचाऱ्यांची सेवा नोंद तपासून तात्काळ जिल्हाबाह्य बदली करण्याची मागणी केली आहे. ही कारवाई न केल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.