कळंब येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कळंब/जयनारायण दरक
कळंब महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 22 नोव्हेंबर रोजी 85 वा वर्धापन दिन कामगार कल्याण केंद्र कळंब येथे उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र संचालक उमेश जगदाळे (धाराशिव – कळंब ) यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमात महिला व मुलीसाठी रांगोळी स्पर्धा या वेळी घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह. भ .प. सुनीतादेवी महादेव महाराज अडसूळ (वारकरी साहित्य परिषद) धाराशिव जिल्हा अध्यक्षा या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डिकसळ ग्रामपंचायत सदस्य संगीताताई मुंडे, विजयाताई पांचाळ ,अनिताताई मोरे ,यांची उपस्थिती होती. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा ह .भ .प .सुनीतादेवी अडसूळ महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात कामगार कल्याण मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात, यामुळे कामगार व कामगार कुटुंबीयांना त्यांच्यात असणारे कलागुण प्रगट करण्याची संधी मिळते. तसेच विविध क्रीडा स्पर्धा ,भजन गायन स्पर्धा ,महिलांसाठी शिवणवर्ग, कामगार पाल्यासाठी शिष्यवृत्ती ,आरोग्य विषयक मदत मिळत असल्याने त्याचा लाभ होत आहे असे सांगितले. व वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिशु मंदिर बालकांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सहाय्यक केंद्र संचालिका प्रतिज्ञा वरखेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन अनुजा कुलकर्णी यांनी केले. तर आभार दिनेश गिरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशोदा शिंपले, वैशाली घाडगे यांनी परिश्रम घेतले.