वेळ अमावस्या निमीत्त शेतात मोठ्यांसह चिमुकल्यांचीही वर्दळ

येरमाळा प्रतिनिधी- मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वेळ अमावस्या म्हणून साजरी केली जाते. येरमाळ्यात वेळ अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. बळीराजाचा हा मुख्य सण असल्याने या दिवशी बळीराजाच संपूर्ण कुटुंब शेतात असते. सोबतीला मित्र, नातलग वन भोजनाचा आनंद घेत असतात. या दिवशी शहरात व ग्रामीण भागातील खेड्यात शुकशुकाट असतो.लोकांची वर्दळ, असणारी गावे आज शांत असतात.व लोकांची गर्दी ही शेतात जाऊन वनभोजनांचा आनंद घेण्यासाठी असते
मार्गशीर्ष अमावस्या ही म्हणजे वेळा अमावस्या. मुळात अमावस्या म्हणले की एक भिती असते, पण दिवाळी आणि वेळ अमावस्या हे सण आनंददायी सण म्हणून साजऱ्या होणाऱ्या अमावस्या मानल्या जातात. आपल्या महाराष्ट्राला अनेकविध सणांची भलीमोठी परंपरा आहे. त्यातलाच हा एक सण. ही वेळा अमावस्या लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात साजरी होते. तसे पाहायला गेले तर हा मूळचा कर्नाटकातला सण आहे. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे.
शेताच्या काळ्या आईच्या पूजेचा हा दिवस, ही आई आपल्याला धान्य देते, पालनपोषण करते, तिचे उपकार स्मरण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी शिवार गर्दीने फुलून गेलेले असते. प्रत्येक शेतात घरातील लोक, मित्रमंडळी यांच्यामुळे सगळे शिवार माणसाने फुलून जाते.
या दिवसांत वेळा अमावास्येचा जेवणाचा मेनू हा थंडीला सामोरे ठेऊन तयार केला जातो. हे पदार्थ थंडीच्या दिवसात खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. या काळात रानं विविध भाज्यांनी फुललेले असते. त्यामुळे सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते. बाजरी ऊर्जा देते म्हणून बाजरीचे पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात. गुळसुद्धा उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर आणि हे सगळे पचवण्यासाठी ज्वारीचे पीठ रात्रभर ताकात मुरवून केलेली आंबील, या सर्व पदार्थांनी आधी धरणीमातेची ओटी भरतात.
या दिवशी शेतात कडब्याची म्हणजे धान्यांच्या वाळलेल्या धाटांची खोप बांधतात. पाच पांडवांची आणि इतर देवतांची पूजा करुन नैवेद्य दाखवतात. पूजेनंतर सगळेजण एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात. हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा असतो की ज्यांचे स्वतःचे शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलावतात.
या दिवशी उन्हं उतरली की लोक परतीच्या वाटेला लागतात. एक दिवस काळ्या आईच्या सान्निध्यात राहायच अशी भावना ठेवून लोक मोठ्या प्रमाणात शेताकडे धाव घेऊन कुटुंबासोबत वेळ अमावस्या सण साजरा करतात.