कळंब तालुक्यातील एक आदर्श राजकीय व्यक्तिमत्व . प्रा. शेषराव मडके

तेरणा काठ वृत्तसेवा —कळंब तालुक्यातील मोहा येथील प्रा. शेषराव भीमराव मडके यांचा जन्म 1 जून 1954 रोजी बार्शी तालुक्यातील दगड धानोरे येथे झाला. भीमराव मडके यांना तीन मुलं आहेत त्यापैकी शेषराव मडके हे त्यांचे थोरले चिरंजीव आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा दगड धानोरे येथे झाले. माध्यमिक शिक्षण मोहा येथील ज्ञान प्रसार विद्यालयात झाले. दहावीनंतर अकरावी, बारावी व बी.ए.पर्यंत शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण त्याने कोल्हापूर विद्यापीठातून एम. ए. भूगोल मध्ये पूर्ण केले. त्यानंतरचे शिक्षण शास्त्र पदवी म्हणजेच बी.एड. त्यानी कोल्हापूर विद्यापीठातील सोलापूर या ठिकाणी पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्याकाळचे समाजवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराचा त्यांचावर प्रभाव असल्यामुळे काँग्रेस एस म्हणजे समाजवादी काँग्रेस पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली.
समाजवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व त्याकाळी डॉ. पद्मसिंह पाटील हे करत होते. डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याने समाजवादी काँग्रेस पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. त्यांना 1980 साली शरद पवार यांनी स्वतः बार्शी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवण्यासाठी विचारले होते. परंतु परिस्थितीचा विचार करून त्यांनी विधानसभा लढण्यासाठी त्याकाळी नकार दिला. शरद पवार सुद्धा त्यांना नावानिशी शेषराव म्हणून ओळखत असे, कळंब तालुका काँग्रेस (एस)पक्षा चे युवक अध्यक्ष म्हणून त्यांनी 1980 ते 86 काम केले. त्याच काळात काँग्रेस एस.चे कळंब तालुका अध्यक्ष म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (गुरुजी) हे काम करत होते. फादर काँग्रेस एस आणि युवक काँग्रेस एस यांनी एकत्रित काम केल्यामुळे कळंब तालुक्यामध्ये काँग्रेस ( एस) चे संघटन मजबूत होते.
1983 साली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी त्यांना आपल्या संस्थेत शिक्षक म्हणून घेतले. छत्रपती संभाजी नगर येथे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये केल्यानंतर जिल्ह्याचे नेते पद्मसिंह पाटील, शरद पवार यांच्याबरोबर तेही काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांना जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष करण्यात आले. तर 1990 साली त्यांना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले हे काम त्यांनी 1992 पर्यंत केले. या कालावधीत ही काँग्रेस मजबूत करण्यासाठी त्यांनी विशेष असे प्रयत्न केले. राजकारणामध्ये हुजरे गिरी वाढली होती व काही विघ्नसंतुष्ट माणसं डॉ. पद्मसिंह पाटील यांना त्यांच्याविषयी भरवत होते.
त्याच वेळेस 1992 ला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यामध्ये मोहा पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण पुरुषासाठी सुटला होता.त्यावेळेस त्यांनी तिकीट मागितलं परंतु पद्मसिंह पाटील यांनी त्यांना उमेदवारी नाकारली कारण त्यावेळेस जिल्ह्याचे नेतृत्व जरी पद्मसिंह पाटील करत असले तरी जिल्हास्तरावर उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पवनराजे निंबाळकर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जीवन गोरे असे दोन गट होते. शेषराव मडके हे पवन राजे निंबाळकर यांच्या गटाचे गणले गेल्याने त्यांना उमेदवारी देण्यास जीवन गोरे यानी विरोध करून उमेदवारी टाळली. त्यावेळेस त्यांनी बंडखोरी करून मोहा पंचायत समिती मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली परंतु त्यांना निसटता 25 मताने पराभव स्वीकारावा लागला. पराभवाने खचून न जाता त्याने पुन्हा नव्या उमेदीने सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिले परत 1997 साली मोहा पंचायत समिती मतदार संघ सर्वसाधारण पुरुषासाठी सुटला परंतु त्याही वेळेस पवनराजे निंबाळकर गटाचे म्हणून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. परत त्यांनी मोहा पंचायत समिती मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला व ते 1500 मताने विजयी झाले. निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती असे निर्माण झाली कळंब पंचायत समिती मध्ये काँग्रेसला 8 शिवसेनेला 7 अशा जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्षाकडून त्यांना आपल्याकडे येण्याची विनंती केली जात होती. परंतु खासदार शरद पवार यांच्यावर त्यांची निष्ठा असल्याने त्यांनी परत काँग्रेस म्हणजेच पद्मसिंह पाटील यांना सहकार्य केलं व कळंब पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. यावेळी त्यांना उपसभापती करण्यात आले. या कालावधीमध्ये सुद्धा त्याने अनेक गोरगरिबांचे पंचायत समितीच्या माध्यमातून काम केली.
त्याकाळी मोहा येथे एकच प्राथमिक दूध उत्पादक संस्था होते गावातील राजकारणातून विरोधी पक्षात गेलेल्या लोकांचे दूध घेतले जात नसायचे म्हणून त्यांनी मोहा येथे शरद दूध उत्पादक प्राथमिक संस्था नावाने संस्था काढली व दूध उत्पादकांचा प्रश्न मिटवला. त्याचबरोबर व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था काढून त्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदत केली. त्याचबरोबर लोकांना त्याकाळी वाचनाची सवय होती. आजच्या सारखा मोबाईलच्या जमाना नव्हता म्हणून त्याने 1980 साली शिवशक्ती वाचनालयाची स्थापना केली.
संस्थेमध्ये अनेक उद्देश होते. त्यामध्ये शैक्षणिक संस्था ही काढता येत होत्या परंतु शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजीवर यांची नितांत श्रद्धा असल्याने त्यांनी संस्था काढण्यासाठी कधीही प्रयत्न केला नाही. त्यांना गुरुजींची संस्था ही माझी संस्था आहे असे वाटायचं त्याचे एक उदाहरण म्हणून मी सांगतो मी 1990 साली गौतमराव मडके सामाजिक संस्था ची स्थापना केली होती. व 1993 ला मी मोहा येथे प्रार्थमिक व माध्यमिक कन्या शाळेचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यांना न माहीत होऊ देता. परंतु त्यांना माहीत झाल्यानंतर तो प्रस्ताव त्यांनी मला माघार घेण्यास भाग पाडले. कारण त्यांची निष्ठा ही मोहेकर गुरुजीवर होती. त्यांच्यानंतरही त्यांचे चिरंजीव ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्यावरही त्यांचे गुरुजी इतकेच प्रेम आहे. ज्ञान प्रसारक मंडळाच्या अनेक निवडणुका मी पाहिल्या परंतु निवडणुकीमध्ये डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या मागे ते खंबीरपणे नेहमीच उभा राहिले. संस्थेत त्यांनी प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष काम केले व 31 मे 2012 रोजी ते सेवानिवृत्त झाले. आजही त्यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे, कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजेंद्र चव्हाण, तेरण्याचे माजी संचालक अशोक शिंदे, ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक तात्यासाहेब पाटील,श्रावण सावंत, कळंब पंचायत समितीचे माजी सभापती सुदन पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती मधुकर कोठावळे, बोर्डाचे माजी सरपंच बाबुराव शेळके, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अशोक तांबारे, खेरड्याचे माजी सरपंच लोकरे, विक्रम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रमेश देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती तात्यासाहेब देशमुख हे त्यांचे त्या काळातले राजकीय मित्र आहेत.
राजकारणात आपण नेहमी काका पुतण्यांचं राजकारण पाहतो. परंतु तेरण्याचे माजी संचालक गौतमराव मडके हे त्यांचे चुलते आहेत. परंतु काका पुतण्यामध्ये राजकारणातून कधीही दुरावा निर्माण झाला नाही. दोघे काका पुतण्ये एका विचाराने राजकारण, समाजकारण करायचे आणि आजही ते ऐका विचाराने करतात. त्याच काळी पाच वर्षासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे दोन्ही त्यांच्या ताब्यात होते. त्यांनी गावातील युवकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून गाळे बांधले. त्या गाळ्याशिवाय मोहा गाव मध्ये परत एक ही गाळा बांधण्यात आला नाही. मोहा गाव अनेक वर्षापासून विकासापासून मागे पडत गेले. त्यानंतर वीस वर्षांनी त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप मडके यांच्या ताब्यात सध्या ग्रामपंचायत आली आहे. त्या माध्यमातून त्यांनी आत्ता गावात लोकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने आरो प्लांट टाकला आहे. त्याचबरोबर गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. गावातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शिवण क्लासचे मोफत वर्ग घेतले. शेषराव मडके यांना प्रा. महेश मडके मुलगा व शितल मडके मुलगी आहे. मुलगा हा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून मुलगी शितल मडके ही पुण्यामध्ये स्वतःचे हॉस्पिटल टाकून रुग्ण सेवा करत आहे. हे सर्व सामाजिक कार्य करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांची अर्धांगिनी रेखाताई मडके या उभ्या आहेत. आज त्यांचा 72वा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
….
संभाजी गिड्डे
कळंब